तुळजापूर : मराठा समाजाचे आरक्षण टिकविण्यात राज्य सरकारचे प्रयत्न कमी पडले आहेत. या सरकारमध्ये समन्वयच नाही, असा आरोप राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केला आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. संयम कधी सोडायचा हे आम्हाला माहीत आहे. गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असेही त्यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारला जागे करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसर्या पर्वाला शुक्रवार(दि. 9) पासून तुळजापुरातून सुरुवात झाली. या आंदोलनात संभाजीराजे बोलत होते. खासदार ओमराजे निंबाळकरही आंदोलनात सहभागी झाले होते.
आम्ही भीक नाही तर आमचा हक्क मागत आहोत. आम्हाला गृहित धरू नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका असा इशारा देऊन येत्या 15 तारखेला अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी या वेळी केली. आता थांबणे नाही. मराठा समाजाचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात घुमला पाहीजे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Check Also
काला पानी @ ६८; राज खोसला आणि देव आनंद जोडीची रहस्यरंजकता…
दिग्दर्शक राज खोसला यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. जन्म ३१ मे १९२५. आणि मृत्यू ९ …
RamPrahar – The Panvel Daily Paper