Breaking News

अवकाळी पावसाने भातपिक पाण्याखाली

जोमदार पिकात साचले चिखल; बळीराजा चिंतेत

राज्य शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी

चिरनेर : रामप्रहर वृत्त – सध्या सुरू असणार्‍या धुव्वाधार अवकाळी पावसामुळे उरण पूर्व विभागातील शेकडो एकर भातपिक पाण्याखाली गेले आहे. पावसाच्या आस्मानी संकटामुळे तयार झालेल्या भातपिकाचा चिखल झाल्याने बळीराजा पार उध्वस्त झाला आहे. आता वर्षभर कुटुंबाचे पोट कसे भरू या चिंतेने शेतकरी राजा ग्रासला आहे. राज्य शासनाकडून नुकसान भरपाई तत्काळ मिळण्यात यावी, अशी बळीराजा मागणी करीत आहे.
उरण तालुक्यातील शेतकर्‍यांचे भात हे एकमेव नगदी पीक आहे. उरणच्या पश्चिम भागात औद्योगिकरणामुळे भातशेती नामशेष झाली असली तरी उरणच्या पूर्व भागात आजही शेकडो एकर शेतीत शेतकरी भाताचे पीक घेतात. वाढती महागाई तसेच मजुरांचे दर वाढल्याने भातशेती सध्या फायद्याची राहिली नाही. तरी आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी शेतकरी भातपिक घेत आहेत. येथे उच्च प्रतीचा तांदूळ मिळत असल्याने अनेक शेतकरी खर्च करून भाताच्या विविध वाणांची लागवड आवडीने करतात.
यावर्षी पाऊस चांगला पडल्यामुळे भातशेती जोमदार झाली होती. त्यात चांगले पीक सुद्धा आले होते. मात्र सध्या सुरू असलेल्या धुव्वाधार वादळी अवकाळी पावसामुळे जोमदार पीक शेतात साचलेल्या पाण्याखाली बुडाले आहे. अवघ्या काही दिवसात या पिकाची कापणी झाली असती. मात्र शेतात साचलेले पाणी कितीही प्रयत्न करूनही कमी होत नसल्याने पाण्यात बुडालेले पीक कुजून त्याची पार चिखल माती झाल्याचे चित्र शेकडो एकर भातशेतील दिसत आहे.
या आस्मानी संकटाने शेतकरी वर्ग पूर्णतः उध्वस्त झाला असल्याने त्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी तालुका कृधी विभागाने नुकसानग्रस्त भातशेतीचे तातडीने पंचनामे सुरू केले आहेत. त्यामुळे काहीतरी नुकसान भरपाई मिळेल, अशी शेतकर्‍यांना आशा निर्माण झाली आहे.
वादळी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे तातडीने पंचनामे सुरू केले असून लवकरच शासकिय निर्णयानुसार शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात येईल.
-उमेश गाताडी, कृषी अधिकारी, उरण
भातशेती सध्या तोट्यातील व्यवसाय झाला आहे.त्यातच अशा आस्मानी संकटाने पूर्णतः नुकसान होत असल्याने भातशेतीला पर्यायी व्यवसाय शोधण्याची वेळ आली आहे
-धनाजी नारंगीकर, प्रगतशील शेतकरी, चिरनेर

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply