रोहा तालुक्यातील भातशेती गेली पाण्याखाली
रोहे : प्रतिनिधी
गेले चार दिवस रोहा तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. विजेच्या कडकडाटासह कोसळणार्या जोरदार पावसाने तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी तालुक्यातील शेतकर्यांकडून होत आहे.
यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे रोहे तालुक्यात भात पीक जोमात आले होते. पीक कापणीला तयार असताना अचानक गेल्या चार दिवसांपासून परतीचा पाऊस संपुर्ण तालुक्याला झोडपून काढीत आहे. शनिवारीपासून परतीच्या पावसाने कोसळण्यास सुरुवात केली असून, तो अजूनही बरसत आहे. मंगळवारी रात्री रोह्यात जोरदार पाऊस पडला. हीच परिस्थिती बुधवारी दुपारी दिसून आली. पाऊस असाच कायम राहिल्यास हे भात कुजण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील मेढा, नागोठणे, खांब, कोलाड, सुतारवाडी, घोसाळे, धाटाव, विरझोलीर, भालगाव, चणेरा, यशवंतखार, सानेगाव, पिंगळसई, देवकाने आदी भागात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे या भागातील उभे भातपीक शेतात आडवे झाले आहे. तर काही ठिकाणी कापणी सुरू असताना परतीचा सुरू झाल्याने भात पीक भिजले आहे. त्यामुळे भात पीक वाया जाण्याची भीती शेतकर्यांतून व्यक्त केली जात आहे.
परतीच्या पावसामुळे पिंगळसई, धामणसई या परिसरासह रोहा तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी.
-खेळू ढमाल, शेतकरी, रोहे