नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
लस येत नाही तोवर आपल्याला कोरोनाशी युद्ध सुरूच ठेवायचे आहे. कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. कोरोनाची लस जेव्हा कधी येईल ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचेल यासाठीही सरकारची तयारी झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी (दि. 20) देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी या काळात कोणीही निष्काळजीपणा केला, तर त्यामुळे आपल्या आनंदावर विरजण पडू शकते. सावधगिरी बाळगून सगळे व्यवहार करा, असेही सूचित केले.
कोरोनाच्या संकटाशी आपण चांगली लढाई दिली आहे, मात्र लॉकडाऊन संपला असला तरीही व्हायरस गेलेला नाही हे विसरू नका. भारताने आपली स्थिती सावरली आहे. ती आपल्याला आणखी उंचवायची आहे. आता हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. सणवारांचे दिवस आहेत, बाजारात काहीशी चमक दिसू लागली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, आज आपल्या देशात कोरोना रुग्णांसाठी 90 लाखांपेक्षा जास्त बेड्स उपलब्ध आहेत. 12 हजार क्वारंटाइन सेंटर्स आहेत. देशातील चाचण्यांची संख्या 10 कोटींचा टप्पा ओलांडेल. कोरोनाविरोधात लढताना जास्तीत जास्त चाचण्या करणे ही आपली ताकद आहे. आपण काही फोटो पाहतो आहेत त्यातून असे दिसतेय की, लोक निष्काळजीपणा करीत आहेत, कोरोनाबाबत जे काही नियम घालून दिले आहेत ते पाळत नाहीत. एक लक्षात ठेवा तुम्ही केलेली एक चूक ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबीयांसाठी धोकादायक ठरू शकते. सगळे आनंद साजरे करा, जबाबदारी म्हणून घराबाहेर पडा, पण करोना रोखण्यासाठी जे नियम पाळणे आवश्यक आहेत.
Check Also
भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी नवा अध्याय -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पनवेल ः रामप्रहर वृत्तसहकारी तत्त्वावरील भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी एक नवा अध्याय असून …
RamPrahar – The Panvel Daily Paper