Breaking News

जवानांच्या हौतात्म्याचे घाणेरडे राजकारण; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केवडिया येथे एका सभेला शनिवारी (दि. 31) संबोधित केले. या वेळी त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करीत विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. आज मी येथे अर्धसैनिक दलाची परेड पाहत असताना माझ्या डोळ्यापुढे एक चित्र तरळले. हे चित्र होते पुलवामा हल्ल्याचे. जेव्हा आपले वीरपुत्र जाण्याने संपूर्ण देश दु:खी होता, तेव्हा काही लोक त्या दु:खात सहभागी नव्हते. ते पुलवामा हल्ल्यात आपला राजकीय स्वार्थ पाहत होते, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. त्या वेळी काय काय वक्तव्ये केली गेली हे देश कधीही विसरणार नाही. जेव्हा देशावर मोठा आघात झाला होता, तेव्हा स्वार्थ आणि अहंकाराने भरलेल्या घाणेरड्या राजकारणाने किती टोक गाठले होते, असे मोदी पुढे म्हणाले. पंतप्रधान मोदींनी नावे न घेता काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. आता पाकिस्तानने सत्य स्वीकारल्यानंतर यांचे खरे चेहरे समोर आले आहेत. आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे लोक कोणत्या पातळीपर्यंत घसरू शकतात याचे पुलवामा हल्ल्यानंतर केले गेलेले राजकारण एक मोठे उदाहरण आहे, असे मोदी म्हणाले. देशाचे हीत आणि आमच्या सुरक्षा दलांचे मनोबलाचा विचार करता कृपा करून राजकारण करू नका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांना केले. आपल्या स्वार्थासाठी, कळत-नकळतपणे देशविरोधी शक्तीच्या हाती लागत तुम्ही ना देशाचे हित करणार ना स्वत:च्या पक्षाचे, असेही मोदींनी सुनावले.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply