Breaking News

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता विखे-पाटलांची पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी

मुंबई ः प्रतिनिधी

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसच्या प्रचारापासून लांब राहिलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. माझी भूमिका मी पक्षाकडे पत्राद्वारे स्पष्ट केली आहे. निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यायचा आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे जे वास्तव आहे ते पक्षश्रेष्ठींकडे मांडले आहे. कार्यकर्ते काँगेसवर नाराज आहेत. पक्षनेतृत्वाने ही स्थिती जाणून घ्यायला हवी. लोकसभेपेक्षा विधानसभेत महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडतील, असा दावा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत विखे-पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही. मी भाजपात जाणार आहे, ही चर्चा आमच्याच पक्षातील काही नेत्यांनी जाणीवपूर्वक सुरू केली आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. मी नेहमीच आपले काम प्रामाणिकपणे करण्यावर विश्वास ठेवतो. विधिमंडळात काँग्रेस नेता म्हणून काम करताना पक्ष नेतृत्वाने आपल्या मागे ठामपणे उभे राहायला हवे, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. पक्षाची जी संयुक्त पत्रकार परिषद झाली,  तीही अचानक घेण्यात आली. आमचे काही कार्यक्रम नियोजित असतात. त्यामुळे नाराज वगैरे काही नाही. पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिलीय, ती मी निष्ठेने पार पडेन, मात्र सध्याच्या घडीला तरी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे, अशी खंतही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली.

-काँग्रेस कार्यकर्ते करणार भाजपचा प्रचार

दरम्यान, भाजपसोबत जाण्याची अहमदनगरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे. विखे-पाटील कुटुंबाबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात प्रेम आहे. ही निवडणूक पक्षीय पातळीवर राहिली नाही. कार्यकर्त्यांनीच डॉ. सुजय विखे-पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून कारवाई झाली तरी चालेल, अशी मानसिकता कार्यकर्त्यांची आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या बाजूने उभा राहत नाही, अशी नाराजी त्यांच्यात आहे, असेही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

-राष्ट्रवादीशी आघाडी करण्यावर नाराजी

आघाडी केल्याशिवाय पर्याय नाही, अशा भूमिकेत वावरणार असाल, तर पक्षातील कार्यकर्ते सक्षम होणार नाहीत. आघाडी करायची की नाही हे पक्ष नेतृत्वाने ठरवायचे असते. पक्षातील ज्येष्ठ नेते पक्षासाठी काम करतात असे वाटत नाही. नेत्यांकडून पक्षाला भक्कम करण्याची भूमिका दिसत नाही. काँग्रेसने कार्यशैलीत सुधारणा केली नाही, तर लोकसभेपेक्षा विधानसभेत अधिक फटका बसू शकतो, असा इशारा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला आहे.

तसेच राज्यातील नेते कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकले नाहीत. नेतृत्व करण्याची क्षमता ज्यांच्यात नव्हती त्यांना नेतृत्व दिले, तर पक्ष उभा कसा राहणार? काँग्रेस पक्षाचा इतका दारुण पराभव महाराष्ट्रात कधीच झाला नाही. ज्या सुधारणा करणे गरजेचे आहे, त्या केल्या गेल्या नाहीत, असा आरोपही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता केला. दिलीप गांधी यांच्या भेटीबाबत विखे-पाटील यांनी स्पष्टीकरण दिले की, दिलीप गांधी यांच्याशी जुना स्नेह आहे. राजकीयदृष्ट्या भेटायचे असते तर लपून भेटलो असतो. दोघांचे संबंध स्नेहपूर्ण आहेत. गांधी यांच्या मुलाने उभे राहावे की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. व्यक्तिगत संबंधातून आम्ही नेहमीच भेटतो. त्यातून राजकीय अर्थ काढू नये. शरद पवारांनी अहमदनगरच्या उमेदवाराच्या डोक्यात हवा गेली आहे, अशी टीका सुजय विखेंवर केली होती. या प्रश्नावरही विखे-पाटील यांनी भाष्य करीत सुजय हा पवारांच्या नातवासारखा आहे. काँग्रेस पक्षाची उमेदवारी सुजय मागत होता. शरद पवारांनी अशी वक्तव्ये टाळावी. विखे कुटुंबाबाबत जो द्वेष आहे त्यातून शरद पवार असे वक्तव्य करतात, असे त्यांनी सांगितले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply