मुंबई : प्रतिनिधी
भाजप तसेच विविध संघटनांच्या मागणीनंतर राज्यातील धार्मिक स्थळे सोमवार (दि. 16)पासून अखेर खुली होणार आहेत. त्यामुळे भाविक-भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, मंदिरात प्रवेश करताना कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे लागणारे आहे. अनेक मंदिर देवस्थान ट्रस्टनेही नियमावली तयार केली आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरे खुली केली जाणार आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त केले जातेय. मंदिरात जाताना नियमांचे पालन करावे लागणार आहे. या संदर्भात राज्य शासनाकडून विविध सूचना करण्यात आल्या आहेत. मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. याशिवाय संबंधित देवस्थानांकडून दर्शनाला मंदिरात जाण्यापूर्वी थर्मल टेस्टिंग, नोंदणी करून मर्यादित प्रवेश दिला जाणार आहे. बाहेरून येणार्या भाविकांना वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने आरती आणि दर्शन बुकींग करूनच दर्शन घेता येईल. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यापाठोपाठ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही हा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असे म्हटलेय.
RamPrahar – The Panvel Daily Paper