Breaking News

अर्णब गोस्वामींविरुद्ध आरोप सिद्ध होत नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. या अटकेनंतर दिवाळीआधी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. गोस्वामी यांना जामीन देण्यामागील कारणांचा सर्वोच्च न्यायालयाने उलगडा केला असून, उच्च न्यायालयाने चूक केल्याचे सांगत अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध आरोप सिद्ध होत नाही, असे स्पष्ट केले आहे.
मूळचे अलिबाग येथील इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. त्यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला, मात्र उच्च न्यायालयाने जामीन फेटाळून लावत त्यांना सत्र न्यायालयात जाण्यास सांगितले होते. उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयाला आव्हान देत गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सर्वोच्च न्यायालायात या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती चंद्रचूड आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंठपीठाने अर्णब गोस्वामींची 11 नोव्हेंबर रोजी जामीनावर सुटका केली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि. 27) सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना जामीन देण्यामागील कारण स्पष्ट केले. पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये त्यांच्याविरोधातील आरोप सिद्ध होत नाहीत. उच्च न्यायालयाने या प्रकरणी योग्य ती पडताळी केली असती, तर त्यांना भा. दं. वि. कलम 306 व एफआयआर यांच्यामध्ये काही संबंध नसल्याचे दिसून आले असते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
जर आरोपी पुराव्यांमध्ये छेडछाड करू शकतो वा आरोपी पळून जाऊ शकतो किंवा गुन्हा करण्याची शक्यता असेल यावरून आरोपीला तुरुंगात ठेवायची गरज आहे की नाही हे सगळे नंतर समोर आले आहे. सध्या हे प्रकरण एका नागरिकाच्या स्वातंत्र्याबद्दल आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply