कर्जत नगर परिषद सांडपाण्यावर प्रक्रिया करणार
कडाव : प्रतिनिधी : कर्जत शहरातील मुख्य नाल्याचे सर्व सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट उल्हास नदीत सोडण्यात येते आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे, तसेच शहरातील मुख्य नाल्याचे पक्के बांधकाम सुरू असून, नदीत सोडण्यापूर्वी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे नदीत सोडल्या जाणार्या साडेतीन एमलडी सांडपाण्यापैकी दीड एमलडी पाणी फिल्टर झाल्याने नदीचे प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार आहे.
प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर शहरातील ज्या ठिकाणी मुख्य नाल्याचे पाणी उल्हास नदीत सोडण्यात येते, त्यापैकी तीन नाल्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली.
शहरातील नाले बंदिस्त झाल्यानंतर ते तुंबण्याचे प्रकार थांबणार असून, डासांच्या उत्पत्तीला आळा बसून, दुर्गंधीही कमी होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील उघडे नाले बंदिस्त करण्याचे काम सुरू असून, त्यामुळे नाल्यात टाकण्यात येणार्या कचर्याला आपोआपच आळा बसेल, तसेच नाले तुंबण्याचे प्रकार थांबतील, दुर्गंधीही थांबेल. नदीत सांडपाणी सोडण्यापूर्वी त्याच्यावर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत.
-रामदास कोकरे, मुख्याधिकारी, कर्जत नगर परिषद
सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यामध्ये वाळूचे विशिष्ट थर लावून तसेच जाळ्या बसवून त्यातून सांडपाणी फिल्टर करण्यात येणार आहे, तसेच त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे बॅक्टेरियाही नष्ट होतील. त्यानंतर पाणी नदीत सोडण्यात येईल.
-सुवर्णा जोशी, नगराध्यक्षा
RamPrahar – The Panvel Daily Paper