Breaking News

लग्नाचे वचन देऊन ठेवलेले संबंध बलात्कार नाही -न्यायालय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
लग्नाआधी रिलेशनशीपमध्ये अथवा विवाहाचे वचन देऊन अनेक तरुण-तरुण शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. मुलांकडून लग्नाचे वचन पूर्ण झाले नाही तर त्यांच्यावर बलात्काराचा आरोप लावला जातो. या संदर्भात एका याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. लग्नाचे वचन देऊन लैंगिक संबंध ठेवणे हा नेहमीच बलात्कार असतो असे नाही, असा मोठा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने एका महिलेची याचिका फेटाळली आहे ज्यामध्ये तिने लग्नाचे वचन देऊन बलात्कार करणार्‍या व्यक्तीच्या सुटकेला आव्हान दिले होते. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले की, लग्नाचे वचन देऊन शरीरसंबध ठेवण्याला बलात्कार म्हटले जाऊ शकत नाही, जर महिला दीर्घ काळापासून त्या व्यक्तीसोबत सतत शरीरसंबंध ठेवत असेल.
न्यायमूर्ती विभू बाखरू यांनी स्पष्ट केले की, जर पीडिता काही क्षणात शरीरसंबंध ठेवण्यास तयार झाली असेल तर लग्नाचे अमिष दाखवून ते ठेवल्याचे आपण म्हणू शकतो तसेच काही प्रकरणांमध्ये महिलेची इच्छा नसतानाही लग्नाचे वचन महिलेला शरीरसंबंध ठेवण्यास प्रेरित करू शकते. अशा प्रकरणांमध्ये लग्नाचे वचन देऊन बलात्कार केल्याचा गुन्हा ठरतो, पण जेव्हा दीर्घ काळासाठी शारीरिक संबंध ठेवले गेले असतील तेव्हा ते ऐच्छिक आणि लग्नाच्या हव्यासापोटी ठेवण्यात आल्याचे सिद्ध होते.
संबंधित प्रकरणातील आरोपीला सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले होते. त्यानंतर पीडितेने दिल्लीच्या उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाचा निर्णय कायम राखत उच्च न्यायालयातही बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला दोषमुक्त करण्यात आले.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply