मुंबई : प्रतिनिधी
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाकडून विरोध केला जात असतानाच भाजपने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर शिवसेनेची भूमिका अत्यंत दुटप्पी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नसून, आता ती औरंगजेबसेना झालेली आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी (दि. 5) केली. मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सत्तेत असूनही शिवसेना औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्यासाठी काहीही प्रयत्न करीत नाही. ज्याप्रमाणे औरंगजेबांनी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला बोलावून विश्वासघाताने त्यांना अटक केली, त्या औरंगजेबाप्रमाणे सध्याच्या शिवसेनेचे वर्तन आहे. शिवसेनेची बोलण्याची भाषा वेगळी असते. प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र शिवसेना वेगळी भाषा वापरते. ते कसब आता शिवसेनेने अवगत करून घेतले आहे. म्हणूनच आता ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसून ती औरंगजेबसेना झाली आहे, असे उपाध्ये म्हणाले.
मतांचे राजकारण करीत शिवसेनेने औरंगजेबाची वृत्ती दाखविली. शिवाजी महाराजांचा जयघोष करणार्या शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराबाबत आपली भूमिका एकदा स्पष्ट करावी, असे रोखठोक मतही त्यांनी या वेळी मांडले.
Check Also
हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…
चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …
RamPrahar – The Panvel Daily Paper