Breaking News

भारतीय खेळाडू सुविधांपासून वंचित?; हॉटेलमध्ये करावी लागतेय टॉयलेटची सफाई

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर टीम इंडियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात ब्रिस्बेन येथे होणार्‍या चौथ्या कसोटीवर कोरोना व्हायरसमुळे संकट होते. त्यातही भारतीय संघ तेथे दाखल झाला, मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून त्यांना कोणत्याही प्रकारच्या क्वारंटाइन नियमांत सूट मिळालेली नाही. उलट त्रास वाढला आहे. एका वृत्तानुसार भारतीय संघ मंगळवारी ब्रिस्बेन येथे दाखल झाला. तेथील सोफीटेल हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. गॅबा स्टेडियमपासून पाच किलोमीटर अंतरावर हे फाइव्ह स्टार हॉटेल आहे. हे हॉटेल चांगले आहे, परंतु येथे कैद्याप्रमाणे राहावे लागते. ’आम्हाला रूममध्ये बंद करण्यात आले आहे. स्वतःला बिछाना नीट करावा लागत आहे. टॉयलेटही स्वतःच साफ करीत आहोत. नजीकच्या भारतीय रेस्टॉरंटमधून आमच्यासाठी जेवण मागवले जाते आणि फ्लोअरवर ते दिले जाते. आम्ही फ्लोअर सोडून कुठेच जाऊ शकत नाही,’ असे या  वृत्तात नमूद आहे. संपूर्ण हॉटेल रिकामे आहे, परंतु खेळाडूंना तेथील स्विमिंग पूल व जिमसह कोणत्याच सुविधांचा लाभ घेता येत नाही. हॉटेलमधील कॅफे व रेस्टॉरंट्स बंद आहेत, असे भारतीय संघातील सदस्याने सांगितले आहे. ब्रिस्बेनमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही, तरीही खेळाडूंना रूमबाहेर पडता येत नाही. भारतीय संघ आधीच दुखापतींशी झगडत आहे. त्यांना मूलभूत सुविधा, जशा स्विमिंग पूल व जिम यांचा वापर करण्यास मिळाला तर ते अडचणींवर मात करू शकतील. हॉटेलमध्ये एकदेखील अन्य पाहुणा नाही. मग खेळाडूंना का परवानगी दिली जात नाही, असा सवाल करण्यात येत आहे. दरम्यान, ब्रिस्बेनमध्ये मिळत असलेल्या अशा प्रकारच्या वागणुकीवर भारतीय संघ व्यवस्थापन नाखूश आहे आणि त्यांनी ही सर्व परिस्थिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कानावर टाकली आहे. ’त्यांनी आम्हाला जे वचन दिले होते आणि इथे जी वागणूक मिळतेय ती परस्परविरोधी आहे. या दौर्‍यापूर्वी आम्हाला बर्‍याच गोष्टी सांगण्यात आल्या. 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यास खेळाडूंना मूलभूत सुविधा दिल्या जातील, इत्यादी. आता आम्हाला स्वतः बिछाना घालावा लागत आहे. टॉयलेटदेखील साफ करावे लागत आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जेव्हा भारतात येतील तेव्हा बीसीसीआय त्यांना अशी वागणूक देईल का,’ असेदेखील विचारण्यात येत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply