खालापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचवली गोहे, आत्करगाव, आडोशी व इतर गावांच्या दळणवळणासाठी अनेक वर्षापूर्वी चिंचवली गोहे गावाजवळ पूल उभारण्यात आला होता. या पूलावर जागोजागी खड्डे पडल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. या पूलावर लहान-मोठे अपघात घडत असल्याने वाहनचालकांसह प्रवासी, परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. चिंचवली गोहे, आत्करगाव, आडोशी ही मोठ्या लोकवस्तीची गावे आहेत. या गावातील ग्रामस्थांसाठी अनेक वर्षापूर्वी चिंचवली गोहे गावाजवळील ओढ्यावर पूल बांधण्यात आल्याने येथील रहिवाशांना आजूबाजूच्या गावांशी, खोपोली, मुंबई – पुणे महामार्गाला संपर्क करणे सोयीचे झाले आहे. या पूलावरून दररोज हजारो लोक, विद्यार्थी, चाकरमानी तसेच वाहनांची रहदारी असते. या पुलावर खड्डे पडले आहेत. ते चालकांच्या लवकर लक्षात येत नसल्याने हे खड्डे अपघाताला कारण ठरत आहेत. पावसाळ्यात तर या पुलावरून प्रवास करणे मोठ्या जिकिरीचे बनत असल्याने अनेकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रशासनाने या पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे, जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नाही.