Breaking News

टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजपची मागणी लसीकरण कार्यक्रमात अकार्यक्षमता; आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी

कोरोना विरुद्धच्या लसीकरण मोहिमेला मुंबईसह राज्यात मोठी खीळ बसली असून मुंबईत मंगळवारी दिवसभरात केवळ 13 लोकांना व राज्यभरात केवळ 181 लोकांनाच कोरोना लस देण्यात आली आहे. राज्यात 9.83 लाख लसी उपलब्ध असताना सुद्धा केवळ राजकारण करण्यासाठी लस कमी देण्यात आल्याची ओरड केली जात आहे. केंद्राकडे बोट दाखविणार्‍या महाविकास आघाडी सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळेच राज्यात लसीकरण मोहीम सपशेल अपयशी ठरली असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य व अजब-गजब कारभारामुळे महाराष्ट्र देशाचा कोरोना कॅपिटल बनला आहे. कोरोना संसर्ग व कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूच्या बाबतीत दुर्दैवाने आजही महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य असून, राज्याचा मृत्यदर आज ही 2.54 टक्के इतका आहे. तसेच मागील महिन्याभरात देशातील कोरोना रुग्णांचा दर झपाट्याने कमी होत असला तरीही आजसुद्धा देशातील एकूण रुग्णांपैकी 42 टक्के रुग्ण हे केवळ महाराष्ट्र व केरळ या दोनच राज्यातील आहेत. येथील मृत्यूदराच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक असल्यामुळे राज्य सरकारकडून लसीकरण मोहीम अधिक गांभीर्याने घेऊन जलद व नियोजनबद्ध लसीकरण मोहीम राबविण्याची आवश्यकता होती, परंतु तसे न करता केवळ केंद्राकडे बोट दाखवण्याचेच काम राज्याकडून करण्यात येत आहे, असे भातखळकर म्हणाले. मुंबईतील जेजे या एकाच रुग्णालयात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. हीच अवस्था राज्यभर आहे, मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्रात केवळ 181 लोकांनाच लस देण्यात आली आहे. तसेच राज्यसरकार व मुंबई महापालिका यांच्यात समन्वय नसल्यामुळे शनिवार व रविवार या दोन दिवशी लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी ‘इतके कमी लसीकरण होणे यात काहीही विशेष बाब नाही’ असे वक्तव्य केले. अकार्यक्षम सरकार अशी बिरुदावली मिरवणार्‍या महाविकास आघाडी सरकारने कोरोना विरुद्धच्या लसीकरण कार्यक्रमात सुद्धा आपली अकार्यक्षमता कायम ठेवली आहे, असा आरोपदेखील अतुल भातखळकर यांनी केला आहे.त्यामुळे कोविड लसीकरणाच्या नियोजन शुन्य कारभारावरून राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

12 कोटी जनतेला किती काळ लागेल? राज्य सरकारकडून हीच ’गती’ कायम ठेवण्यात आली तर महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला लस मिळण्यास किती कालावधी लागेल याचा विचार राज्य सरकारने केला आहे काय, असा प्रश्नदेखील भातखळकर यांनी केला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply