नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बॉर्डर-गावसकर मालिका जिंकून मायदेशी परतलेल्या भारतीय संघातील सदस्य असणार्या हनुमा विहारीने तिसर्या कसोटीनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदी असणार्या राहुल द्रविडसंदर्भात एक खुलासा केला आहे. सिडनीमधील तिसर्या कसोटी सामन्यात दुखापतीनंतर एखाद्या योद्ध्याप्रमाणे खिंड लढवणार्या विहारीला सामना संपल्यानंतर द्रविडने एक खास मेसेज केला होता. स्वत: विहारीने ही माहिती मुलाखतीमध्ये दिली.
तिसर्या कसोटीतील पराभव टाळण्यासाठी मैदानावर तग धरत हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी तब्बल 259 चेंडू खेळून काढले. याबाबत बोलताना विहारी म्हणाला की, सिडनी कसोटीनंतर द्रविड सरांनी मला मेसेज केला होता. त्यांनी मला खूप छान खेळलास, तू खूप छान काम केले आहेस, असा मेसेज पाठवला होता. ते असेच आहेत म्हणून त्यांचा खूप आदर वाटतो.
या मुलाखतीत विहारीने राहुल द्रविडचे सध्याच्या संघातील खेळाडू घडवण्यामधील योगदानाबद्दलही सांगितले. द्रविड सरांनी भारतीय अ संघाच्या प्रशिक्षकपदाची भूमिका बजावताना अनेक खेळाडूंना रणजी चषक आणि भारतीय संघातील स्थान यामधील अंतर कमी करण्यासाठी मदत केली. मलाही संधी मिळाली. त्यांच्यामुळेच हे शक्य झाले आहे, अशी विनम्र भावनाविहारीने व्यक्त केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper