शेकापचा बालेकिल्ला ढासळला
नागोठणे : प्रतिनिधी
विभागातील वरवठणे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून असणारा शेकापचा बालेकिल्ला 25 वर्षांनंतर ढासळला असून, बुधवारी (दि. 10) झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजप (आमदार रविशेठ पाटील समर्थक), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामविकास आघाडीने आपला झेंडा रोवला आहे.
बुधवारी झालेल्या निवडणुकीत आघाडीच्या ऋतुजा गणपत म्हात्रे यांची सरपंचपदी, तर उपसरपंचपदी विजय अशोक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राकेश जंगम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. येथे सत्ता आणण्यासाठी आघाडीचे गणपत ल. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाकर म्हात्रे, नथुराम पाटील, संतोष म्हात्रे, पांडुरंग ल. म्हात्रे, कृष्णा ल. म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, श्रीकांत पाटील, प्रशांत म्हात्रे यांच्यासह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले होते.