खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली फूडमॉलजवळ पाच वाहनांच्या अपघातात सहा जणांचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई मार्गिकेवर मंगळवारी (दि. 16) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ट्रक, टेम्पो आणि दोन कारवर एक कंटेनर मागून धडकून हा अपघात झाला. जखमींना पनवेल व नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्या कंटेनरचा (आरजे 51-जीबी 2238) आडोशी हद्दीत ब्रेक फेल झाला. अनियंत्रित झालेला हा कंटेनर आधी टेम्पो (एमएच 14-जीडी 3880) आणि ट्रकला (एमएच 14-पी 6870) धडकून इनोव्हा (एमएच 12-एलएक्स 4599), क्रेटा (एमएच 47-एडी 4025) या दोन कारवर उलटला.
या अपघातात मंजू प्रकाश नाहर (वय 58, रा. गोरेगाव-मुंबई), डॉ. वैभव वसंत झुंझारे (41), उषा वसंत झुंझारे (63), वैशाली वैभव झुंझारे (वय 38) श्रिया वैभव झुंझारे (5, चौघेही रा. नेरूळ, नवी मुंबई) हे जागीच मृत्युमुखी पडले, तर कंटेनरचा क्लिनर काळूराम जमनाजी जाट याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय स्वप्नील सोनाजी कांबळे (30), प्रकाश हेमराज नाहर (65, दोघेही रा. गोरेगाव-मुंबई) अर्णव वैभव झुंझारे (11, नेरूळ-नवी मुंबई) आणि किशन चौधरी असे चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Check Also
अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …
RamPrahar – The Panvel Daily Paper