कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यातील कडाव ग्रामपंचायत हद्दीतील माणकिवली हेजवळपास तीनशे लोकवस्तीचे गाव असून ते विकासापासून दूर असल्याचे चित्र दिसत आहे. गावात ये – जा करण्यासाठी कडाव – माणकिवली हा एकमेव रस्ता असून, त्यावरून जाताना पादचार्यांना तारेवरची कसरत करावी लागते तर दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहनांतून प्रवास करणार्यांना उंटावरून प्रवास करत असल्याचे जाणवते, इतकी दूरावस्था कडाव – माणकिवली या रस्त्याची झाली आहे.
माणकिवली गावाच्या प्रवेशद्वाराशेजारी असलेली सिमेंट काँक्रिटची मोरी संपुर्ण दुभंगली असून, या मोरीला भलेमोठे भगदाड पडले आहे. मोरीच्या खालील बाजूच्या सर्व दगडीचिरा उघड्या पडल्या आहेत तसेच सिमेंट काँक्रिटचे आवरण निघाल्याने आतील लोखंडी सळया गंजून त्यांचे तुकडे होत आहेत. त्यामुळे एखादे अवजड वाहन मोरीवरून गेल्यास दुर्घटना होऊन जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संबंधित प्रशासनाने व कडाव ग्रामपंचायतीने लवकरात लवकर कडाव – माणकिवली रस्त्यावरील धोकादायक मोरी दुरुस्त करावी, किंवा नव्याने उभारावी तसेच माणकिवली गावाला जोडणार्या रस्त्याचेही डांबरीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे यांनी केली आहे.