चालकाच्या प्रसंगावधानामुळे 50 प्रवाशांचे प्राण वाचले
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरून पुण्याकडून मुंबईकडे जाणार्या एम ट्रॅव्हल्स या कंपनीच्या बसचे (एमएच-03,सीव्ही-3778) सोमवारी (दि. 8) सकाळी बोरघाटातील ढेकू गावाजवळ ब्रेक निकामी झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवून महामार्गालगत असलेल्या झाडाच्या आधारावर ही बस थांबवली. त्यामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले. बस झाडाला अडली नसती शंभर फूट दरीत कोसळून मोठा अनर्थ घडला असता.
या अपघाताचे वृत्त समजताच ढेकू गावातील सूरज पाटील यांनी आपल्या 10सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेत 38प्रवाशांना बसमधून सुरक्षीत बाहेर काढले. त्यात यात 14 महिला व सहा लहान मुलेही होती. त्यांना पाणी व बिस्किटांचे वाटप केले. या अपघातात सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. महामार्ग मृत्युंजय गृप, महामार्ग पोलीस व आयआरबी यंत्रणेने अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था केली.
दुसरा अपघातात भरधाव टेम्पोने समोरच्या अज्ञात वाहनाला धडक दिल्याने टेम्पोमधील एकजण गंभीर जखमी झाला. त्याला खोपोलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper