खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर
खारघर सेक्टर आठ, दहा खाडी किनारा लगतच्या जमिनीवर दूषित पाण्यावर अवैधरित्या पिकविला जाणारा भाजीपाला नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे पनवेल पालिका आणि सिडको प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी खारघरचा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पालिका आणि सिडकोकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मिठागरे आणि खारफुटी जमिनीवर कोणतेही काम करू नये असे आदेश असतानाही खारघरमध्ये खाडी किनारा लगत असलेल्या जमिनीचे सपाटीकरण करून काही परप्रांतीयांनी भाजीपाला व्यवसाय थाटला आहे. हा भाजीपाला ते नाला आणि खाडीतील सांडपाणी वाहून नेणार्या पाण्यावर पिकवितात. संबंधित भाजीपाल्याची हे उत्पादक खारघर परिसरात राजरोसपणे विक्री केला जात आहे. या दूषित व विषारी भाजीपालामुळे खारघर वासियांच्या आरोग्यावर परिणाम होवू शकतो. त्यामुळे या भाजीपाला उत्पादन करणार्यांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी विजय पाटील यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक आणि पालिकेचे प्रभाग अधिकारी यांच्या विभागाकडे केली आहे.
खारघर सेक्टर नऊ परिसरातील रेव्ले रुळाच्या दोन्ही भाजूला असलेल्या नाले आणि खाडी किनार्यावर दूषित सांडपाणी इंजिन लावून भाजीपाला पिकवला जातो. ताजी आणि हिरवीगार भाजी ग्राहक खरेदी करतात, मात्र हा भाजीपाला दूषित पाण्यावर पिकविला जातो ही माहिती ग्राहकांना नसते. हा भाजीपाला आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे हा भाजीपाला व्यवसाय बंद करण्यात यावा, अशी मागणी खारघरचा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper