ग्रामस्थांमध्ये घबराट; घरांना गेले तडे, तक्रार दाखल होऊनही कार्यवाही नाही
महाड : प्रतिनिधी
किल्ले रायगड पुन्हा एकदा स्फोटकांनी हादरली आहे. पायथ्याला खोदण्यात आलेल्या डबर खाणीच्या सुरुंग स्फोटकाने वाळसुरे आणि वरंडोली गावातील घरांना तडे गेले असुन विभागातील नागरीकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. या प्रकरणी महाड महसुल विभागात तक्रार दाखल होऊनही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
किल्ले रायगड ही एक संरक्षित वास्तु असुन, तो भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असुन या कायद्यानुसार रायगडच्या परीसरात कोणत्याही प्रकारच्या उत्खनन आणि स्फोटके लावण्यास बंदी आहे. तसेच वरंडोली हे गाव इको सेंसीटीव्ह झोनमध्ये आहे. मात्र या कायद्याची पायमल्ली करुन एम.बी.पाटील या ठेकेदाराने वाळसुरे आणि वरंडोली या किल्ले रारगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात डबर खानीचे खोदकाम सुरु केले आहे. मोठ्याप्रमात खडी आणि क्रश सॅन्ड निर्मीतीचा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आला आहे. या साठी लागणारा दगड जवळील खानीतुन काढण्यात येत आहे. सदर दगड काढण्यासाठी या भागात मोठ्या प्रमाणात सुरुंग स्फोट (ब्लास्टींग) केले जात आहे. या स्फोटासाठी भुगर्भात 75 मिमी व्यासाचे होल मारुन या मधुन शक्तीशाली स्फोटकांच्या सहाय्याने स्फोट घडवुन आणरे जात आहेत. या स्फोटामुळे या परीसरात जमीनीला भुकंपा सारखे हादरे बसत आहेत. या स्फोटांची तिव्रता एवढी प्रचंड आहे, की वाळसुरे आणि वरेकोंड ( वरंडोली) या गावातील घरांना टडे आणि भेगा गेल्या आहेत. तसेच परिसरातील नागरीकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
वरेकोंड ही या ठिकाणी 40 घरवस्तीची वरंडोली ग्रामपंचायतीची एक वाडी आहे. या स्फोटांमुळे येथील विकास सिताराम चव्हाण, भारती भरत निवगुणे, विठ्ठल पांडुरंग निवगुणे, अनंत सखाराम निवगुणे, भिकाराम सिताराम चव्हाण, गोपिचंद रामचंद्र निवगुणे यांच्या घरांना मोठ मोठे तडे आणि भेगा पडल्या आहेत. या प्रकरणी वरंडोली आणि वाळसुरे ग्रामपंचायतीने महाड प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांना लेखी तक्रार केली आहे. मात्र निवडणुकीच्या कामात मश्कुल असलेल्या महसुल विभागाला नागरीकांवर आलेल्या या संकटाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तर सदर ठेकेदाराच्या कंपनीने क्रशर प्लांट साठी आणि उत्खननासाठी वरंडोली ग्रामपंचायतीची कोणत्याही प्रकारची परवाणगी अथवा ना हरकत दाखला घेतला नसल्याची माहिती सरपंच रामकृष्ण मोरे यांनी दिली आहे. तर या प्रकरणी सदर कंपनीने कोणता ही पत्रव्यवहार केला नसुन खात्याकडुन सर्वे देखील झाला नसल्याचे या विभागाचे तलाठी उमप यांनी सांगितले आहे. प्रशासनाने लवकरच हे स्फोट आणि उत्खनन बंद केले नाहीत तर आम्ही ग्रामस्थ मिळुन हा प्रकल्प बंद पाडु असा इशारा वरेकोंड ग्रामस्थांनी दिला आहे.
वाळसुरे या गावच्या हद्दीमधील दगड खानीला दोन हजार ब्रास उत्खनानची परविनगी देण्यात आली आहे. मात्र स्फोटकांची तिव्रता जर जास्त असेल आणि त्यामुळे स्थानिकांच्या घरांचे नुकसान होत असेल तर या प्रकरणी चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल.
-विठ्ठल इनामदार, प्रांताधिकारी महाड
या डबर खाणीस आणि क्रश प्लॅन्टला वाळसुरु ग्रामपंचायतीने ना हरकत दिला आहे. मात्र ही ना हरकत परवाणगी सदर कंपनीस अटी-शर्तीस आधीन राहुन दिली आहे. मात्र जर अटी-शर्तींचे उल्लंघन झाले असेल तर सदरहुन परवाणगी रद्द करण्यात येईल.
-डी. एस. अंभोरे, ग्रामसेवक वाळसुरे