भाजपच्या प्रसाद लाड यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने राज्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहेत. यावरून ’घरात बसलेल्या’ सरकारने कोरोनाची दुसरी लाट भयावह असणार आहे. याची कल्पना असूनही या काळात अत्यावश्यक असलेल्या सुविधांच्या निर्मितीसाठींही काहीही केले नाही. या नाकर्त्या सरकारमुळेच आज राज्यातल्या सामान्य जनतेचा बळी जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला आहे.
मुंबई येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते. या वेळी लाड पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम केअर फंडातून निधी देण्यात आला होता. मात्र आघाडी सरकारने या निधीचा विनियोगच केला नाही. केंद्राने दिलेला निधी आणि मुख्यमंत्री निधीतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे केले असते तर राज्यात ऑक्सिजन अभावी अनेकांचा बळी गेला नसता. केंद्र सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेल्या निधीचे काय केले याचा आघाडी सरकारने हिशोब द्यावा, अशी मागणी लाड यांनी केली.
कोरोना महामारीच्या काळात कोणत्याच राज्याला अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनची कमतरता भासू नये, प्रत्येक राज्य या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2021 मध्ये राज्य सरकारांना पत्रे पाठवली होती. त्यानुसार ’पीएम केअर’ निधीतून महाराष्ट्राला 10 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी निधी देण्यात आला. मात्र, गेल्या चार ते पाच महिन्यांत या निधीचा वापर करून राज्य सरकारने एकही प्रकल्प सुरू केला नाही. गेल्या काही दिवसांत ऑक्सिजन अभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. केंद्राने दिलेले अर्थसहाय्य व मुख्यमंत्री निधीत पडून असलेला पैसा यातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे राहिले असते.
एका पोलीस अधिकार्याकडून वसुली करणार्या या सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेला निधी ’खाऊन’ टाकला अशी घणाघाती टीका प्रसाद लाड यांनी केली.
पालघरच्या तलासरी सारख्या दुर्गम भागात आदिवासी बांधवाची अवस्था खुपच बिकट आहे. आरोग्य सुविधांचा तुटवडा आहेत पण सरकारच्या निर्बंधामुळे रुग्णांना जवळ असलेल्या गुजरातमधील रूग्णालयांमध्ये जाता येत नाही. तसेच तेथील डॉक्टरांना तलासरी येथे रूग्णांना उपचार देण्यासाठी येण्याची परवानगी मिळत नाही. राज्य सरकारने आदिवासी बांधवांना उपचार घेण्यासाठी आवश्यक सुविधा द्याव्यात.
पत्रकारांचे तातडीने लसीकरण करा
कोरोना योद्धे म्हणून काम करणार्या पत्रकार बांधवाचे तातडीने लसीकरण करावे व रेल्वे प्रवासासाठी त्यांना पास द्यावेत, अशी मागणीही भाजपचे प्रसाद लाड यांनी केली.
खरेदी केलेल्या सर्व औषधांचा हिशोब द्या
केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मागणीनुसार 10 दिवसांत चार लाख 35 हजार रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आत्तापर्यंत राज्याला एक लाख 65 हजार औषधे मिळाली आहे, तसेच राज्य सरकारनेही विविध यंत्रणांच्या माध्यमातून पाच लाख औषधांची खरेदी केलेली आहे. तरीही सध्या राज्यात औषधांचा तुटवडा आहे. ही औषधे कुठे गायब झाली? या औषधांचा काळाबाजार झाला का? राज्य सरकारने या सर्व औषधांचा हिशोब द्यावा व जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे प्रसाद लाड यांनी म्हटलं.