Breaking News

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी अनाथाश्रम शोधण्याची प्रशासनाची धावपळ; जिल्हाधिकार्‍यांकडून स्थळांची पाहणी

 कर्जत ़: बातमीदार

कोरोनामुळे आई, वडिल गमालेल्या मुलांचा सांभाळ शासन करणार आहे. या अनाथ बालकांसाठी प्रशासनाने बालसुधारगृह आणि अनाथाश्रम यांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असून, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कर्जत आणि नेरळ येथील स्थळांची पाहणी केली. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत. यात अनेक लहानग्यांनी आपले आई-वडिल यांना गमावले आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था या अनाथ मुलांसाठी सातत्याने झटत आहेत. सरकारने या अनाथ बालकांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी अनाथ बालकांची माहिती संकलीत केली जात आहे. प्रशासन जिल्ह्यातील बालसुधारगृह आणि अनाथाश्रम यांची माहिती घेत आहे. त्यानिमित्ताने रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी कर्जत तालुक्याच्या दौर्‍यावर आल्या होत्या. कर्जतच्या प्रांताधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर, तहसीलदार विक्रम देशमुख, बाल संरक्षण कक्षाचे जिल्हा पर्यवेक्षक अशोक पाटील, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी अजिनाथ कारले, नेरळचे प्रभारी पोलीस अधिकारी संजय बांगर या वेळी त्यांच्यासोबत होते. कर्जत नगर परिषद हद्दीमधील दहिवली येथील बालसुधारगृहाची पाहणी करून जिल्हाधिकारी निधी चौधरी या नेरळ जवळील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीमधील आसरा अनाथाश्रम येथे आल्या होत्या. कोरोनाच्या काळात ज्या मुलांचे आई-वडील दगावले आहेत अशा अनाथ मुलांसाठी प्रशासनाकडून  जिल्ह्यातील बालसुधारगृह, अनाथाश्रम अशा स्थळांची माहिती घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या वेळी स्पष्ट केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply