संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा
कोल्हापूर ः प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा छत्रपती खासदार संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. सारथी सोडून इतर मागण्यांबाबत जास्त हालचाली दिसत नाहीत. जर मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
संभाजीराजे म्हणाले, राज्य सरकारबरोबर चर्चा झाल्यानंतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी 21 दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत आता संपत आली आहे, पण एवढ्या दिवसांत सारथी वगळता इतर कोणत्याच मागण्यांबाबत पूर्तता होताना दिसत नाही. मागण्या मान्य झाल्या, पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने आता पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
एक महिन्याची मुदत दिली होती. आणखी 15 दिवस वाट पाहू, पण त्यापेक्षा अधिक वाट पाहणार नाही. आमच्यापुढे मूक आंदोलनाचा पर्याय खुला आहे. दिलेल्या मुदतीत सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास आक्रमक व्हावे लागेल.