नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : सहा महिन्यांपूर्वी क्रिकेटवरून झालेल्या वादातून सहा जणांनी त्यांच्या 22 वर्षांच्या मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीच्या नेब सराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली. मित्राची हत्या करताना सहाही आरोपींनी क्रूरपणाचा कळस गाठला. हत्या करण्यापूर्वी तरुणाचे चाकूने डोळे फोडले. पोटावर सपासप वार केले. त्यानंतर त्याचा गळा चिरला. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी मृतदेहावर मीठ टाकून एका खड्ड्यात पुरला.
पोलिसांच्या माहितीनुसार सुरजित कश्यप असे मृत तरुणाचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याचे आरोपींशी क्रिकेटवरून भांडण झाले होते. या वादातूनच ही हत्या झाली. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. मारेकर्यांनी सुरजितला घरातून बाहेर बोलावले. त्याला एका निर्जन स्थळी घेऊन गेले आणि तिथे चाकूने भोसकून त्याची निर्घृण हत्या केली. चाकूने वार करून त्याचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता. त्याचे डोळे फोडले होते. त्यानंतर त्याचा गळा चिरला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्यावर मीठ टाकून तो खड्ड्यात पुरण्यात आला होता.
सुरजित कश्यप संगम विहारजवळ जवाहर कॅम्प येथे राहत होता. एका फूड कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. सुरजितचा मोठा भाऊ अमितने मंगळवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास तो हरवल्याची तक्रार दिली होती. नातेवाइकांनी त्याच्याबद्दल काही माहिती दिली होती. त्यावरून तपास सुरू केला. हत्येनंतर काही तासांनी सुरजितचा मृतदेह सापडला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी पोलिसांनी सोमबीर सिंघल, विक्की झा, सतबीर आणि विक्की भट यांना अटक केली. गोलू आणि रवींद्र बिस्ट फरार आहेत. त्याचा काटा काढला आहे, असे फोनवरून बोलताना विक्की झा याला सुरजितच्या एका मित्राने पाहिले होते. याबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचा संशय वाढला आणि त्या दिशेने तपास सुरू केला. फोन कॉल्सच्या माहितीनरून घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी विक्की भटला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सतबीर, गोलू आणि रवींद्रच्या मदतीने सुरजितची हत्या केल्याचे त्याने सांगितले. सोमबीर आणि विक्की झाच्या सांगण्यावरून सुरजितचा काटा काढल्याची माहितीही त्याने दिली.