कर्जत : बातमीदार
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल लागले असून, पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून कर्जतमधील विद्यार्थ्यांना ठाणे आणि खोपोलीपर्यंत, तसेच नवी मुंबईत जावे लागत आहे. या विद्यार्थ्यांना रेल्वेने जाण्याची परवानगी आणि उपनगरीय लोकलचे पासेस द्यावेत, अशी मागणी कर्जत भाजप युवा मोर्चाने येथील स्टेशन मास्तरांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कर्जत तालुक्यातील चांगले गुण मिळविणारे विद्यार्थी ठाणे जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यांना घेऊन त्यांचे पालक ठाण्यापासून नवी मुंबईपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. कर्जत तालुक्यातील विद्यार्थ्यांचा ओढा प्रामुख्याने उल्हासनगर, कल्याण, मुंबई येथील महाविद्यालयांकडे असतो, परंतु सध्या कोरोनाविषयक नियमामुळे या विद्यार्थ्यांना लोकल प्रवास करता येत नाही. लोकल प्रवासासाठी तिकीटदेखील मिळत नसल्याने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसमोर अडचणी येत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा देतानाच रेल्वेने पास द्यावा, या मागणीचे निवेदन कर्जत भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी येथील स्टेशन मास्तर भारद्वाज आणि रेल्वे पोलीस निरीक्षक उबाळे यांना दिले. भाजप किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख सुनिल गोगटे, भाजप युवा मोर्चाचे कर्जत तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, शहर अध्यक्ष मयूर शितोळे, चिटणीस सर्वेश गोगटे, तालुका संयोजक अभिषेक तिवारी, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष शिरीष कदम यांच्यासह विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.