Breaking News

नवी मुंबई विमानतळ ‘काम बंद आदोलन’ तूर्त स्थगित

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कृती समितीची घोषणा

पनवेल : प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर सोमवार (दि. 16 ऑगस्ट) पासून सुरू होणारे नवी मुंबई विमानतळ काम बंद आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती लोकनेते
दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने शनिवारी (दि. 14) पत्रकार परिषदेत देण्यात आली. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, या मागणीचा आग्रह धरण्यासाठी दि. 13 ऑगस्ट रोजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची, तसेच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची दिल्ली येथे कृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांच्या भावना त्यांच्या कानी घातल्या. या वेळी त्यांनी शिष्टमंडळाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.
पनवेल शहरातील आगरी समाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल महानगरपालिका उपमहापौर जगदीश गायकवाड, जे. डी. तांडेल, नंदराज मुंगाजी, दीपक म्हात्रे, राजेश गायकर, दीपक पाटील, मनोहर पाटील आदी समितीचे सदस्य उपस्थित होते.
या वेळी 10 जून रोजी झालेले साखळी आंदोलन, 24 जूनला झालेले सिडको घेराव आंदोलन व 9 ऑगस्ट क्रांतिदिनी जिल्ह्यांत, तालुक्यांत व गावागावांत झालेले प्रचंड संख्येचे मशाल मोर्चा आंदोलन या सर्व आंदोलनांची दखल आणि कृती समितीच्या वतीने दि. बा. पाटील साहेबांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलेच पाहिजे यासाठी पेटून उठलेल्या स्थानिक जनतेच्या भावना व आंदोलनाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद याची दखल केंद्राने घेतल्याचे पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देताना सांगण्यात आले. तसेच राज्य सरकारने सिडकोमध्ये केलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव दिल्लीत पाठविलेला नाही. राज्य सरकारच्या कॅबिनेटने असा ठराव केलेलाच नसल्याचे समजते, असे सांगण्यात आले.
ही परिस्थिती लक्षात घेता दि. 13 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबरोबर कृती समितीची बैठक झाली. याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आणि प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांच्या भावना कानी घालण्यात आल्या. केंद्रीय मंत्र्यांनीही या भावनेचा आदर केला, परंतु विमानतळाचे काम पूर्ण होणे हेही प्रकल्पग्रस्त व स्थानिकांच्या दृष्टीने आवश्यक आहे. ज्या केंद्र सरकारने नामकरण करायला हवे त्याच मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचा सन्मान ठेवून, दि. 16 ऑगस्टपासून कृती समितीने पुकारलेले काम बंद आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येत आहे, अशी घोषणा कृती समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत करण्यात आली. राज्य सरकारच्या कॅबिनेटने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव पुढे पाठविण्याचा प्रयत्न केल्यास मात्र भूमिपुत्रांचे हे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला. या आंदोलनाच्या निमित्ताने रायगड, ठाणे, पालघर व मुंबई जिल्ह्यांत अनेक प्रश्न समोर आले आहेत. हे प्रश्न एकत्रितरीत्या सोडविण्यासाठी पावसाळ्यानंतर भूमिपुत्र परिषदेचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे, अशीही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

दिबांनी दिलेल्या मार्गातून प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र एकसंघ झाला आहे. दिबांचे नाव विमानतळाला देण्याबरोबरच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम कृती समितीच्या माध्यमातून केले जाणार आहे. केंद्राने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा आदर करावा.
-दशरथ पाटील, अध्यक्ष, कृती समिती

दिबासाहेबांचे नाव विमानतळाला दिलेच पाहिजे ही भूमिका कायम ठेवत तीन वेळा आंदोलन झाले आणि या आंदोलनांना न भूतो न भविष्यति असा प्रतिसाद लाभला. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रकल्पगस्त भूमिपुत्रांना आश्वस्त केले आहे. दिबासाहेबांचे नाव विमानतळाला देण्यासाठी यापुढेही जनजागृती आणि संघर्ष करण्याची तयारी कायम राहील.
-प्रशांत ठाकूर, आमदार

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply