नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रतिभावान डावखुरी फलंदाज स्मृती मानधना सध्या इंग्लंडमध्ये धुमाकूळ घालत आहे. द हंड्रेडमध्ये तिने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. अशाच प्रकारची स्पर्धा भारतामध्ये आयोजित करण्यात यावी, याबाबत स्मृतीने तिचे मत मांडले आहे.
महिलांसाठी सहा संघांमध्ये आयपीएल स्पर्धा सुरू करावी, अशी मागणी स्मृतीने केली. सहा संघांमध्ये आयपीएल स्पर्धा भरविण्यासाठी देशात पोषक वातावरण आहे. याचा फायदा भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ सुधारण्यास होऊ शकतो. आयपीएलमुळे देशातील पुरुष खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. तसंच महिला क्रिकेटबाबतही होऊ शकतं, असं स्मृतीला वाटतं. भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या यू-ट्यूब चॅनेलवर ती बोलत होती.
स्मृती पुढे म्हणाली, आज जी आयपीएल स्पर्धा भरते तशीच 10 वर्षांपूर्वीही होती. आपल्याकडे क्रिकेट खेळणारे भरपूर खेळाडू आहेत. त्यामुळे पाच किंवा सहा संघांसह ही स्पर्धा आयोजित केल्यास चांगली सुरवात मिळू शकते. कदाचित एक दोन वर्षात आठ संघांपर्यंतही जाऊ शकतो. जर सुरवातच केली नाही, तर आपल्याला कळणार तरी कसे? आयपीएल स्पर्धांमुळे महिला खेळाडूंना चांगल्या संधी निर्माण होतील. तसेच त्यांच्या खेळातही सुधारणा होतील.
RamPrahar – The Panvel Daily Paper