मुंबई ः प्रतिनिधी
मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणार्या शेतकर्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शेतकरी सुभाष जाधव यांनी 20 तारखेला विष पिऊन मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. जाधव यांनी मुलांच्या शिक्षणासाठी गावातील सावकार विलास साधू शिंदे आणि सुशीला सुरेश जाधव यांच्याकडून पाच लाख रुपये पाच टक्के व्याज दराने कर्ज घेतले होते, मात्र हे पैसे सावकार शिंदे यांना न दिल्यामुळे त्यांनी जाधव यांच्या घराची तोडफोड केली होते आणि कुटुंबाला मारहाण केली होती.
या संदर्भात शेतकरी सुभाष जाधव यांनी स्थानिक मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, मात्र पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे शेतकरी जाधव यांनी 20 ऑगस्टला मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना भेटण्यासाठी प्रयत्न करीत होते, मात्र मंत्रालयाबाहेर सुरक्षारक्षकांनी आत प्रवेश न दिल्यामुळे शेतकरी जाधव यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ जाधव यांना उपचारासाठी जीटी रुणालयात दाखल केले होते. जाधव हे आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथील रहिवासी आहेत. अनेकदा मंत्रालयात येऊन न्याय मागितला, पण न्याय मिळाला नाही, असे त्यांनी म्हटले होते. काही वर्षांपूर्वी धर्मा पाटील या शेतकर्याने अशाच प्रकारे मंत्रालयात विष घेऊन आपले जीवन संपवले होते. यानंतर आता या दुसर्या घटनेे पुन्हा मंत्रालय आणि प्रशासन हादरुन गेले आहे. विशेष म्हणजे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदारसंघातील हा शेतकरी असून आता या घटनेनंतर ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मरिन ड्राइव्ह पोलिसांनी सुभाष जाधव यांचा मुलगा गणेश जाधव याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करून पुण्यात मंचर पोलिसांना हस्तांतर केला आहे. या संदर्भात अधिक तपास आता मंचर पोलीस करणार आहेत.