Breaking News

उरणमध्ये जलवाहिनी फुटून पाणी वाया; वारंवार होणार्‍या प्रकाराने एमआयडीसीच्या सुविधेवर प्रश्नचिन्ह

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

उरण परिसराला पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची तीन इंच व्यासाची जलवाहिनी मंगळवारी (दि. 5) सकाळी पुन्हा एकदा अचानक फुटण्याची घटना घडली. जेएनपीटी टाऊनशीप-नवघरदरम्यान फुटलेल्या उच्च दाबाच्या जलवाहिनीमुळे सुमारे 25 फुट उंचीपर्यंत पाण्याचे कारंजे उडून लाखो लिटर्स पाणी वाया गेले, परंतु नवघर ते बोकडविरा या एक किमी अंतरावर एमआयडीसीची जलवाहिनी वारंवार फुटतय कशी हा चर्चेचा विषय ठरला आहे.  उरण तालुक्यातील औद्योगिक, शहर व ग्रामीण परिसरातील दिड लाख नागरिकांना एमआयडीसीच्या माध्यमातून रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मंगळवारी जेएनपीटी टाऊनशीप-नवघरदरम्यान एमआयडीसीची तीन फूट व्यासाची पाण्याची मुख्य जलवाहिनी अचानक फुटली. या फुटलेल्या जलवाहिन्यांमधुन 25 फुटांपर्यंत पाणी उडाले होते. तासभर पाणी मोठ्या प्रमाणावर उडाल्याने जेएनपीटी टाऊनशीप-नवघरदरम्यानच्या रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. एमआयडीसीच्या कर्मचार्‍यांनी तत्काळ व्हॉल्व बंद करून प्रथम वाया जाणारे पाणी थांबवले. दिड तासातच जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करुन पाणीपुरवठा सुरळीत सुरू केला. उच्च दाबामुळे वेल्डिंग जॉइंडला तडा गेल्याने जलवाहिनी फुटली असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता रणजित काळबागे यांनी दिली आहे. उरण शहर तसेच परिसरातील रहिवाशांना, प्रकल्पांना सुरळीत करण्यात येत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या एमआयडीसीच्या नवा जलवाहिनीचे काम मागील वर्षी ठेकेदारांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आले, मात्र असे असतानाही वारंवार नवघर ते बोकडविरा या दरम्यानची जलवाहिनी फुटत असेल तर या मागे गोड बंगाल काय, अशी चर्चा सध्या उरणमध्ये रंगू लागली आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply