नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निरंकुश किंवा हुकूमशाही वृत्तीचे असल्याचे होत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. पंतप्रधान मोदींशी आपला अनेक दशकांपासूनचा संपर्क आहे. तेे लोकशाही मानणारे नेते आहेत. त्यांच्यासारखा समजून आणि ऐकून घेणारा नेता आपण पाहिलेला नाही. पंतप्रधान मोदी छोट्यातील छोट्या व्यक्तीचेही धीराने ऐकतात, असे प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (दि. 10) टीकाकारांना दिले. सरकारी वृत्तवाहिनी संसद टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संवैधानिक कारकिर्दीला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाह यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जोखीम पत्करून निर्णय घेतात. कारण त्यांचा विश्वास आहे की, आम्ही देश बदलण्यासाठी सरकारमध्ये आलो आहोत. सरकार चालण्यासाठी सरकारमध्ये नाही आलो. आमचे लक्ष देशात बदल घडवून आणण्याचे आहेे. शाह यांनी पुढे सांगितले की, देशातील 130 कोटी भारतीयांना जगातील सर्वांत सन्माजनक जागी पोहचवाचे आहे, जे वर्षानुवर्षे इथेच पडून आहेत. आपला युवा वर्ग पश्चिमेकडील देशांकडे गेला नसता जर हे निर्णय झाले असते, पण ते आता होत आहे. कुठल्याही मुद्द्यावर बैठक असल्यावर पंतप्रधान मोदी कमी बोलतात आणि सर्वांचे ऐकून घेतात. त्यानंतर निर्णय घेतात. ते इतका का विचार करतात हा आम्हाला प्रश्न पडतो. दोन-तीन बैठकांनंतर ते धैर्याने निर्णय घेतात, असे शाहांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान मोदींच्या आयुष्यात येणार्या आव्हानांविषयी विचारले असता शाह म्हणाले, त्यांचे सार्वजनिक जीवन तीन भागांत विभागले जाऊ शकते. एक भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचा पहिला काळ हा संघटनात्मक कामाचा होता. दुसरा काळ त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा आणि तिसरा राष्ट्रीय राजकारणात आल्यानंतर पंतप्रधान झाल्यावरचा. पंतप्रधान मोदींना जेव्हा भाजपमध्ये संघटन मंत्री बनवण्यात आले त्या वेळी गुजरातमध्ये भाजपची स्थिती वाईट होती आणि देशात पक्षाच्या दोन जागा होत्या. 1987पासून त्यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतरची पहिली निवडणूक अहमदाबाद महानगरपालिकेची आली. त्या वेळी पहिल्यांदाच भाजप स्वबळावर महापालिकेत सत्तेवर आला. त्यानंतर भाजपचा प्रवास सुरू झाला. 1990मध्ये दोघे एकत्र सत्तेवर आलो. मग 1995मध्ये पूर्ण बहुमताने सत्तेत आलो आणि तेथून भाजपने आजपर्यंत मागे वळून पाहिले नाही, असे शाह यांनी सांगितले.