Breaking News

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘गती शक्ती’चा शुभारंभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 13) नवी दिल्ली येथे मल्टी मोडल कनेक्टिव्हिटीसाठी पीएम गति शक्ती राष्ट्रीय महायोजनेचा प्रारंभ केला. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरील नवीन प्रदर्शन संकुलाचे उद्घाटनही त्यांनी केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, हरदीपसिंग पुरी, सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य सिंधिया आणि अश्विनी वैष्णव, आर के सिंह, मुख्यमंत्री नायब राज्यपाल, राज्य मंत्री, प्रख्यात उद्योगपती या वेळी उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आत्मनिर्भर भारत या संकल्पामुळे पुढील 25 वर्षांसाठी भारताचा पाया आज रचला जात आहे. पीएम गति शक्ती राष्ट्रीय महा योजना (मास्टर प्लॅन) भारताचा आत्मविश्वास आत्मनिर्भरतेच्या संकल्प सिद्धीकडे घेऊन जाईल असे ते म्हणाले, हा मास्टर प्लान 21 व्या शतकातील भारताला गती शक्ती देईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारतातील जनता, भारतीय उद्योग, भारतीय व्यवसाय, भारतीय उत्पादक, भारतीय शेतकरी गतिशक्तीच्या या महाअभियानाच्या केंद्रस्थानी आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला. आम्ही केवळ निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याची कार्यसंस्कृती विकसित केली नाही तर आता प्रकल्प वेळेपूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मास्टर प्लॅनच्या आधारे काम केल्यामुळे संसाधनांचा योग्य वापर होईल.

भारतातील पायाभूत विकासाचा वेग वाढवण्यासाठी उचललेल्या पावलांबद्दल या वेळी पंतप्रधानांनी सविस्तर विवेचन केले.  देशातील शेतकर्‍यांचे, मश्चिमारांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर प्रक्रियांशी संबंधित पायाभूत सुविधा वेगाने वाढवल्या पाहिजेत असे पंतप्रधानांनी सांगितले. पीएम गतीशक्ती ही मोठी महत्वाची सहकार्य करणारी बाब असणार आहे. जेएएम म्हणजेच जनधन आधार आणि मोबाईल ही त्रिसूत्री जनतेपर्यंत सरकारी सुविधा पोचवणारी ठरली त्याचप्रमाणे पायाभूत सुविधा क्षेत्रात ’पीएम गती शक्ती’ महत्वपूर्ण काम करेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

उद्योग क्षेत्रातील आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, ट्रॅक्टर्स आणि फार्म इक्विपमेंट्सच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक मलिका श्रीनिवासन, टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक आणि भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष टीव्ही नरेंद्रन आणि रिविगोचे सह-संस्थापक दीपक गर्ग यांनी या वेळी आपले विचार व्यक्त केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply