संपात सहभागी कर्मचार्यांवर कार्यवाही नाही; वाहतूक अधिकारी मनीषा पाटील यांचे आश्वासन
मुरूड : प्रतिनिधी
मुरूड आगाराचा आज तिसर्या दिवशी संप संपुष्टात आलेला आहे. रायगड विभाग नियंत्रक कार्यालयाकडून मुरूड आगारातील एसटी कर्मचार्यांसोबत चर्चा करण्यासाठी विभागीय वाहतूक अधिकारी मनीषा पाटील यांनी आज प्रत्यक्ष कर्मचार्यांची भेट घेऊन संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांवर कोणतीही कार्यवाही करणार नाही, असे आश्वासन दिले. राज्य शासन कर्मचारी म्हणून समाविष्ट करण्यात यावे ही कर्मचार्यांची प्रमुख मागणी शासन स्तरापर्यंत पोहचवली जाणार आहे. तरी सर्व कर्मचार्यांनी समजूतदारपणे भूमिका घेऊन आपला संप मिटवावा व वाहतूक सुरू करावी, अशी विनंती केल्यावर मुरूड आगारातील सर्व कर्मचार्यांनी आपला संप मिटवला असून कर्मचारी तातडीने आपल्या सेवेत हजर झाले आहेत.
या वेळी मनीषा पाटील यांनी मुरूडच्या कर्मचार्यांना सांगितले की, रायगड जिल्ह्यातील आठही डेपो सुरू झाले आहेत. आपणही त्यामध्ये समाविष्ट होणे आवश्यक आहे. दिवाळी सण असून प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोहचवणे खूप आवश्यक असून तेव्हा तातडीने कामावर रुजू होण्याचे आवाहन या वेळी त्यांनी केले व त्याला कर्मचार्यांनी होकार दिल्यामुळे आज सर्व कर्मचारी कामावर त्वरित हजर झाले. त्यामुळे मागील दोन दिवसापासून बंद असलेली एसटीची वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. या वेळी कर्मचार्यांना आपले आंदोलन हे नियमबाह्य असून कोर्टाने आपले अपील फेटाळले असल्याची माहितीसुद्धा देण्यात आली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper