लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन
उरण : रामप्रहर वृत्त
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून जागतिक पातळीवर देशाचे नाव पुढे आहे, आर्थिक विकासासह सर्वच क्षेत्रात भारताने उसळी मारली आहे. एकसंघ असलेला भारत मजबूत होत आहे. भारताला यापुढे आणखी मजबूत करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देणे आणि त्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना निवडून देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
आंध्र, कर्नाटक, तामीळ, ओडिसा, मल्याळम, उत्तर भारतीय आणि सिंधुदुर्ग रहिवासी मंडळ बांधवांच्या बैठकी घेतल्या. सर्व समाज बांधवांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा दर्शवला. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते. या वेळी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सभागृह नेता परेश ठाकूर, नगरसेवक संतोष शेट्टी, भास्कर शेट्टी, रामदास शेवाळे, श्रीधर वासाला, श्रीनिवास, महेश कोलार, सतीश राजू, शंकरराव, जगमुनी चक्र, रवींद्र पिल्ले उपस्थित होते.
भारताच्या कानाकोपर्यातून विविध जाती, धर्म, प्रांतातून आलेले लोक पनवेलमध्ये गुण्यागोविंदाने राहत आहेत. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी सर्व समाजबांधवांनी ठरवले आहे. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले की, मागील पाच वर्षांपासून महायुतीच्या सरकारने देशात सक्षमपणे काम केले आहे. पंतप्रधान मोदी हे विनाखंड देशासाठी काम करतात. आपल्याला केवळ एकदाच मतदानाच्या माध्यमातून देशहिताचे काम करायचे आहे. देशासाठी आपलं प्रत्येकाचं मत महत्त्वाचं आहे. सर्व जाती, धर्म आणि प्रांतातील लोक गुण्यागोविंदाने राहतात. हा एकोपा कायम ठेवण्याचा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला.
भारतातील प्रत्येक नागरिकाला विकास हवा आहे. मोदी सरकारने त्या प्रत्येक नागरिकाची विकासाची भूक भागवली आहे.विकासाचा आलेख चढता ठेवण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायला हवेत.
-आमदार प्रशांत ठाकूर