डोंबिवली : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन 2 वर्षे झाली असून या काळात राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर आणण्याचे धोरण राबवले आहे, असा घणाघाती आरोप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला. ते जन आक्रोश मोर्चा वेळी जनतेला संबोधित करीत होते. घन कचरा कर रद्द, लाईट बिल माफ करण्यासह विविध मागण्यांसाठी डोंबिवलीत भाजपने जनआक्रोश मोर्चा काढत राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. पूर्वेतील दत्तनगर चौक ते इंदिरा चौकापर्यंत आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला. एकीकडे सार्वजनिक सेवा सुविधांचा बट्ट्याबोळ झाला असून सार्वजनिक आरोग्य सुविधाही वाईट अवस्थेत आहे, एसटीसारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली असून वीज बिलांमध्येही भरमसाठ वाढ झाल्याचेही यावेळी भाजपतर्फे सांगण्यात आले. या सर्व मुद्द्यांचा आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचे आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले. या मोर्चामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, मंदार हळबे, भाजप ग्रामीण महिला मोर्चाच्या अध्यक्ष मनीषा राणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
Check Also
खानावमध्ये शेकाप कार्यकर्ते भाजपात
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा …
RamPrahar – The Panvel Daily Paper