‘आदित्य संवाद’ला तरुणाईचा मोठा प्रतिसाद



खोपोली : प्रतिनिधी
मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे लोकप्रियतेबरोबरच कामगिरीतदेखील सरस ठरले आहेत. बारणे यांना सलग पाच वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला असून, मावळचा आवाज संसदेत उठविण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा संसदेत पाठवा, असे आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बुधवारी (दि. 24) ‘आदित्य संवाद’ हा कार्यक्रम झाला. त्यात तरुणांच्या प्रश्नांना ठाकरे यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. खासदारांना पुन्हा का निवडून द्यावे, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी, बारणे यांची कामगिरी सांगत. त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले. या वेळी आमदार डॉ. नीलम गोर्हे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, रघुनाथ कुचिक, आमदार गौतम चाबुकस्वार, एकनाथ पवार, नीलेश बारणे, जितेंद्र ननावरे उपस्थित होते.
शिवसेना-भाजपची युती देशहित आणि हिंदुत्वामुळे झाली आहे. एकीकडे देशहित, देशाची सुरक्षा पाहणारी महायुती, तर दुसरीकडे देशद्रोहाचे कलम काढून टाकू असे म्हणणार्यांचे महागठबंधन आहे. महागठबंधनच्या नेत्यांकडून देश तोडण्याची भाषा केली जाते. त्यांना दोन पंतप्रधान हवे आहेत. त्यामुळे कोणाला निवडून द्यायचे याचा सर्वांनी विचार करावा, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. सर्व जगाचे लक्ष आपल्या लोकसभेच्या निवडणुकीकडे लागले आहे, असेही ठाकरे म्हणाले.
खासदाराला 24 तास 7 दिवस काम करावे लागते. वर्षातील सगळे दिवस मतदारसंघासाठी राखीव ठेवावे लागतात. मागील पाच वर्षात श्रीरंग बारणे यांनी ती कामगिरी केली असून त्यात ते यशस्वी झाले आहेत. मावळचा आवाज दिल्लीत बुलंद करण्यासाठी बारणे पुन्हा संसदेत जाणे गरजेचे आहे.
-आदित्य ठाकरे, युवासेनाप्रमुख
RamPrahar – The Panvel Daily Paper