कर्जत : प्रतिनिधी
स्वावलंबन फाउंडेशन मुंबई या संस्थेच्या ’स्वावलंबन क्वीन- 2021’ या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा प्रारंभ शुक्रवारी (दि. 10) कर्जतमध्ये करण्यात आला. या महाअंतिम फेरीसाठी राज्यातील 80 महिला निवड झाली आहे.
स्वावलंबन संस्थेने राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातील सुमारे दोनशे महिलांची ऑनलाइन परीक्षा घेतली होती. त्यातून 80 स्पर्धकांची महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. कर्जत तालुक्यातील पोसरी परिसरातील ’वसंत सृष्टी’च्या खुल्या सभागृहात शुक्रवारी महिला चित्रकार हर्षदा कडू हिच्या हस्ते या महाअंतिम फेरीचे उद्घाटन करण्यात आले.
हा उपक्रम म्हणजे महिला सक्षमीकरणाचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे संस्थेच्या सचिव विभा परब यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले. मनीषा सुर्वे यांनी या स्पर्धेचा हेतू विषद केला. ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुवर्णा काकुसते यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते मुकेश सुर्वे, संस्थेच्या खजिनदार वनिता चव्हाण, मानसी वेदक, उद्योजक संजय कडू, जान्हवी असलेकर, विद्या गोकर्णकर, सीमा देसाई – नायर, पूजा इंदुलकर, अंजली ब्रह्मे, अपर्णा खोत, सोनाली कोदे, सोनाली नाईक, अर्चना हेंदळेकर आदींसह महिला व स्पर्धक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.