पाली ः प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. या सरकारला संवेदनाच नाहीत, अशी खरमरीत टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी (दि. 19) येथे बोलताना केली. महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे, असाही आरोप त्यांनी केला.
पाली नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाजपच्या रॅलीत सहभाग घेतला व पाली शहराच्या विकासासाठी भाजप उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. त्या वेळी ते बोलत होते.
लखिमपूर खेरी येथील घटनेसाठी महाविकास आघाडीतील नेते गळा काढतात, कॅबिनेटमध्येच श्रद्धांजली वाहतात आणि या आपल्याच मातीतले एसटीचे 22 कर्मचारी आत्महत्या करतात, मृत्युमुखी पडतात तेव्हा एकाच्या तरी डोळ्यात अश्रू आले का? अश्रू ढाळायचे सोडा उलट तुमच्यावर मेस्मा लावतो, तुमचे निलंबन करतो, तुमच्यावर कारवाई करतो अशा प्रकारे या कर्मचार्यांना दाबण्याचे व त्यांचा संप चिरडण्याचे काम हे सरकार करीत आहे. सरकारने हा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता त्यांच्या विलिनीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा; नाही तर सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा दरेकर यांनी दिला.
सरकारच्या भावना ओबीसींना आरक्षण न देण्याच्या आहेत. याचे कारण न्यायालयाने चार चार वेळा नोटिसा पाठवूनही त्याचे उत्तर सरकारला देता आले नाही. जे सर्वोच्च न्यायालयाला अभिप्रेत आहे तशा प्रकारचा अध्यादेश या सरकारने काढला नाही आणि इम्पिरिकल डेटा केंद्र सरकार देत नाही म्हणून उलट्या बोंबा हे सरकार मारीत होते, पण सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम केंद्र सरकारचे नसून राज्य सरकारचे आहे. मागासवर्गीय आयोग गठित करणे, इम्पिरिकल डेटा गोळा करणे, ट्रिपल टेस्ट करणे जरूरीचे आहे. त्याच्याशिवाय ओबीसींना आरक्षण देता येणार नाही, मात्र राज्य सरकारला गेले नऊ महिने गेले इम्पिरिकल डेटा गोळा करता आला नाही. या सरकारचे पितळ उघड झाले, असा हल्लाबोल दरेकर यांनी केला.
रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष नगरपंचायत निवडणुकीला सामोरा जातोय. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व इतर विरुद्ध भाजप अशी लढत आहे. हे आव्हान आमच्यासाठी मोठे नाही. याचे कारण ते सोयीस्करपणे एकमेकांना मिठ्या मारून आघाड्या करीत आहे. काही ठिकाणी ते वेगळे झाले. भाजप स्वतंत्रपणे लढत आहे.
यावरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर लक्षात येईल की हे सत्तेसाठी एकत्र आहेत आणि नगरपंचायतीमध्ये एकमेकांचे पाय ओढत आहेत. लोकांना खरी वस्तुस्थिती कळते. यांचे जे काही चालले आहे ते सत्तेसाठी चालले आहे. आमचा पक्ष हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार जनतेमध्ये पोहोचविण्याचे काम करीत असून जनमानसामध्ये पक्षाची आणि नेत्यांची प्रतिमा आहे.
कोरोनाचा काळ असेल, वादळाचे संकट असेल अशा वेळी आमच्या कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन लोकांना आधार देण्याचे काम केले. त्या वेळी यांचे नेते घरात होते, यांचे सरकार घरात होते. आमचे कार्यकर्ते रस्त्यावर होते, लोकांना मदत करीत होते याची जाणीव ठिकठिकाणी लोकांना आहे. त्यामुळेच ते भाजपच्या उमेदवारांना विजयी करतील, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …