मोहोपाडा : प्रतिनिधी
रसायनी गुळसुंदे येथील स्वामी विवेकानंद तुंगारतन विद्यालयातील सन 1991-92 या दहावीच्या वर्गात शिक्षण घेणार्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा 30 वर्षांनंतर मोठ्या उत्साहात करण्यात आला. रसायनी परिसरातील हे मित्रमंडळी तब्बल 30 वर्षांनंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र आले. आपल्या वर्गमित्रांना एकत्रित आणण्याचे काम देवळोली येथील सामाजिक कार्यकर्ते धनाजी पाटील यांनी केले. त्यांनी गुळसुंदे तुंगारतन विद्यालयात सन 1991-92 या वर्षात दहावीच्या वर्गात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचे मोबाइल नंबर जमवाजमव करून त्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला व सावळे देवळोली येथील उसरण धरण येथील निसर्गरम्य परिसरात स्नेहमेळावा आयोजित केला. या वेळी एकत्र माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गप्पा गोष्टी केल्या. आपल्या 30 वर्षांतील काही माहिती एकमेकांना सांगितली. यानंतर माजी विद्यार्थ्यांनी वालाच्या शेंगांच्या पोपटीचा आस्वाद घेवून भोजनाचा कार्यक्रम झाला. यापुढे आपल्या ग्रुपमधील कोणावरही काही संकट आले तर सुखदुःखात त्याच्या सर्वांनी सहभागी व्हायचे असे ठरले. या वेळी स्नेहमेळावा कार्यक्रमात जिल्हा परिषद महिला व बालकल्याण माजी सभापती प्रिया मुकादम सहभागी झाल्या होत्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper