Breaking News

कामावर उशिरा येणार्‍या तब्बल 191 कर्मचार्‍यांची वेतन कपात; नवी मुंबई मनपाची कारवाई

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई महानगरपालिका कर्मचार्‍यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या धर्तीवर पाच दिवसांचा आठवडा 26 फेब्रुवारी 2020 रोजीच्या महापालिका प्रशासन विभागाच्या परिपत्रकान्वये लागू करण्यात आलेला आहे तसेच कार्यालयीन वेळही निश्चित करून देण्यात आली आहे, मात्र ही वेळ न पाळल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने 191 कर्मचार्‍यांची वेतन कपात केली आहे. कार्यालयीन कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत अशी आहे. त्यातही शिपाई संवर्गाकरीता ही वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत अशी आहे. कार्यालयीन कामकाजाची ही वेळ पाळणे सर्व महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना बंधनकारक आहे. मात्र अनेक अधिकारी, कर्मचारी हे कार्यालयीन वेळेचे बंधन पाळत नाहीत व त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी आयक्तांकडे प्राप्त होत होत्या. या अनुषंगाने कार्यालयीन शिस्तीचे पालन करण्याविषयी आयुक्तांच्या निर्देशांनुसार प्रशासन विभागामार्फत परिपत्रकही निर्गमित करण्यात आले होते. असे असतानाही 17 फेब्रुवारी आणि 24 फेब्रुवारी रोजी उपस्थितीबाबत अचानक घेण्यात आलेल्या आढाव्यात बहुतांश कर्मचारी पुन्हा उशीरा येत असल्याचे आढळून आले. या कर्मचार्‍यांविरोधात कारवाई करण्याकरीता 3 दिवस करण्यात आलेल्या पाहणीपैकी एक दिवस उशीरा येणार्‍या 165 अधिकारी, कर्मचार्‍यांचे एका दिवसाचे वेतन कपात, दोन दिवस उशीरा येणार्‍या 22 कर्मचार्‍यांचे दोन दिवसांचे वेतन कपात करण्यात आले असून याबाबत त्यांच्या सेवापुस्तकात लाल शाईने नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तीन दिवस उशीरा येणार्‍या चार कर्मचार्‍यांचे वेतन कपात करण्यात आले आहे. शिवाय या चारही कर्मचार्‍यांची बदली करण्यात आली आहे. तसेच त्यामधील महापालिका आस्थापनेवर असलेल्या तीन कर्मचार्‍यांची कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply