कर्जत : प्रतिनिधी
खांडस ग्रामपंचायत हद्दीतील बांगरवाडीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई असताना येथील विहिरीत शुक्रवारी अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ऐन पाणीटंचाईच्या काळात बांगरवाडी येथील विहिरीत विषारी औषध टाकल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहेत, तसेच औषध टाकणार्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.
कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या ओलमन, खांडस भागात आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील विहिरी कोरड्या पडल्या आहेत, तर काही विहिरींना कमी प्रमाणात पाणी मिळते. या भागात शासनाकडून आठवड्यातून एकदा टँकरने
पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे काही ग्रामस्थ महिला या बांगरवाडी विहिरीचा आधार घेत आहेत. असे असताना या भागातील एका अज्ञात व्यक्तीने बांगरवाडीतील विहिरीत विषारी औषध टाकण्याचा घृणास्पद प्रकार केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
घटनास्थळी नेरळ पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला आहे, तर विहिरीत औषध टाकणार्याचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे. या वेळी येथे पंचायत समिती सदस्य कविता एनकर, बाळाराम एनकर, माजी सरपंच प्रकाश एनकर, किसन वारघडे, रोहिदास बांगरे, बुधाजी खडके आदींनी भेटी दिल्या. ऐन पाणीटंचाईच्या काळात विहिरीत विषारी औषध टाकल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper