कर्जत : बातमीदार
कार्ला येथील गडावर बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमासंदर्भात खालापूर तालुक्यातील वयाळ गावातील समीर पवार या तरुणाने जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. या तरुणावर कारवाई करावी, अशी मागणी कर्जत शहर आरपीआयने (आठवले गट) पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आरपीआयच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 16 मे रोजी बुद्ध पौर्णिमेला कार्ला येथे कार्यक्रम झाला आणि केवळ बुद्धवंदना सादर करण्यात आली. त्या ठिकाणी शांततेत कार्यक्रम झाला असताना समीर पवार (रा. वयाळ, ता. खालापूर) याने समाजातील दोन जातींत तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. त्या पोस्टमुळे बुद्ध धर्मीय बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. जातीय तेढ निर्माण करणार्या समीर पवार याच्यावर कारवाई करण्यात यावी. माजी नगरसेवक अरविंद मोरे, कर्जत शहर आरपीआय (आठवले गट)चे किशोर गायकवाड, किशोर जाधव, मनोज गायकवाड, स्वप्नील काकडे, सुशील कांबळे, साहिल मोरे, गुलाब शिंदे आदींनी हे निवेदन दिले.
RamPrahar – The Panvel Daily Paper