रेवदंडा : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील नागाव बायपास रस्त्यावरील पाल्हे पुलावर व परिसरात मोठमोठे खड्डे पडले असून, मात्र तेथून बिनधोकपणे वाहतूक सुरू आहे.
अलिबाग-रेवदंडा मार्गावरील नागाव बायपास रस्त्यावर पाल्हे गावाजवळ पूल आहे. हा पूल कमकुवत असल्याचा फलक सार्वजनिक बांधकाम खात्याने लावला आहे. ऐन पावसाळ्यात या पुलावर आणि पुलाच्या दोन्हीबाजूकडील रस्त्यावर मोठमोठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. या पाल्हे पुलाला नागाव गावातून पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. तरीही या पुलावरून मोठ्या संख्येने वाहनांची जा-ये सुरूच आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने यापुर्वीच पाल्हे पुलावरून अवजड वाहतुकीस बंदी केली आहे, मात्र तरीही या मार्गाने रात्रीच्यावेळी अवजड वाहतूक होत असल्याची स्थानिक ग्रामस्थांची तक्रार आहे.
पाल्हे पुलावरून होत असलेली अवजड वाहतूक बंद करावी, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलाची व जोड रस्त्यांची तातडीने डागडूजी करावी, अशी मागणी परिसारातील ग्रामस्थ करीत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper