पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत नागरिकांचे ऑनलाईन चर्चासत्र व एनएनएसच्या विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती करण्यात येत आहे. कळंबोली येथील शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये महाविद्यालयाच्या एनएनएसच्या विद्यार्थ्यांना या अभियानात बुधवारी (दि. 3) सामील करून घेण्यात आले. उपायुक्त विठ्ठल डाके यांनी या अभियानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या मनिषा बनसोडे, एनएसएस विभाग प्रमुख जाधव तसेच एनएनएसचे 350 विद्यार्थी उपस्थित होते. नागरिकांना या अभियानाची माहिती व्हावी यासाठी एनएसएसचे विद्यार्थी कळंबोली परिसरातील सुमारे साडेतीन हजार घरांना भेट देणार आहेत, तसेच घरोघरी तिरंगा अभियानाची माहिती सांगून, जनजागृती पत्रकांचे वाटप करणार आहेत.
घरोघरी तिरंगा उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात साजरा करावा या उद्देशाने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक, हौसिंग सोयायटी अध्यक्ष, सचिव व कमिटी मेंबर्स, सामाजिक संस्था व बचतगट यांचे नुकतेच गुगलमीटच्या माध्यमातून ऑनलाइन चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर, कामोठे, पनवेल, कळंबोली भागातील विविध सोसायट्यांमधील नागरिक, सामाजिक संस्था, बचत गट यांचे सदस्यांनी सहभाग घेतला.
उपायुक्त विठ्ठल डाके यांनी 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान घरोघरी झेंडा फडकविण्याबाबतचे मार्गदर्शन नागरिकांना केले, तसेच या अभियानासाठी राष्ट्रीय ध्वज उपलब्धतेसाठी पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. नागरिकांनी तिरंगा ध्वजासोबतचा फोटो (सेल्फी) पालिकेच्या पनवेल महानगरपालिका या फेसबूक अकाउंटला टॅग करण्याबाबत सांगितले.