लंडन : वृत्तसंस्था
क्रिकेट जगतात प्रतिष्ठेच्या असलेल्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटूचे असते, परंतु विश्वचषकात निवड होऊनही दुखापत झाल्यामुळे किंवा अन्य काही कारणास्तव विश्वचषकस्पर्धा अर्ध्यावर सोडण्याची वेळ अनेक खेळाडूंवर आली आहे. यंदादेखील ही मालिका सुरूच आहे.
सध्याच्या विश्वचषकात डाव्या हाताच्या अंगठयाला झालेल्या दुखापतीमुळे भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला विश्वचषकातून बाहेर पडावे लागले आहे. त्याच्या जागी ऋषभ पंतला संघात घेण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेन स्टेनला खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्याची जागा ब्युरन हेंड्रिक्सने घेतली. अफगाणिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद शेहझादला गुडघ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर जावे लागले, परंतु आपल्याविरोधात कट-कारस्थान रचल्याचा दावा तो करीत आहे. त्याच्या जागी इकराम अली खिलला संघात स्थान मिळाले आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलला गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धा सोडावी लागल्यामुळे सुनील अॅम्ब्रिजची निवड करण्यात आली आहे.
– दुखापतींचे आव्हान वाढलेविश्वचषकाच्या प्रारंभापासून आतापर्यंत 30पेक्षाही अधिक खेळाडूंचे अशाप्रकारे स्वप्न भंगले आहे. 1992पासून विश्वचषकातील संघ आणि सामन्यांच्या संख्येत वाढ झाल्याने दुखापतींचे आव्हानसुद्धा वाढल्याचे दिसून येते.
RamPrahar – The Panvel Daily Paper