पाली : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार माजविला असून, ठिकठिकाणी दरड कोसळत असताना सुधागड तालुक्यातील ताडगाव येथील कोटबेवाडी आदिवासी वाडीजवळ मोठे भूस्खलन झाले आहे. तेथे अनेक ठिकाणी जमिनीला लांब व रुंद भेगा पडून दगड-माती वाहून गेली आहे. या वेळी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसले, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे कोटबेवाडी आदिवासीवाडीपासून काही अंतरावर उत्तरेकडे माळरान जमीन खचली. उताराच्या ठिकाणी सुमारे 90 मीटर लांब, तर इतरही अनेक छोट्या-मोठ्या भेगा पडल्या असून, दगडमाती खाली वाहून गेली आहे. काहींना हा भूकंप झाल्याचे वाटते. त्यामुळे आदिवासी वाडीतील लोक भयभीत झाले आहेत. दरम्यान, तहसीलदार दिलीप रायन्नावार, तलाठी, ग्रामसेवक यांनी मंगळवारी (दि. 6) घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सरपंच छब्या जाधव, तंटामुक्ती कमिटी अध्यक्ष राकेश साठे, केतन साठे व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी ग्रामस्थांनी आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी तहसीलदारांकडे केली. तहसीलदारांनी घटनेसंदर्भात जिल्हाधिकार्यांना अहवाल सादर केला आहे.
अतिवृष्टीमुळे सुधागड तालुक्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. तालुक्यातील जमिनीचे भूगर्भ शास्त्रज्ञांकडून सर्वेक्षण व्हावे, अशी मागणीही केली आहे.
-दिलीप रायन्नावार, तहसीलदार, सुधागड
RamPrahar – The Panvel Daily Paper