दुबई : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) बुधवारी (दि. 27) येथे होणार्या मुख्य कार्यकारी समितीच्या (सीईसी) बैठकीदरम्यान आगामी विश्वचषक स्पर्धेतील सुरक्षेबाबत भारताच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करेल, पण पाकिस्तानवरील संभाव्य बहिष्काराबाबत चर्चा होण्याची शक्यता नाही.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे सुमारे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध 16 जून रोजी मँचेस्टरमध्ये होणार्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. या मागणीचा विचार करीत भारतीय क्रिकेटचे संचालन करणार्या प्रशासकांच्या समितीने (सीओए) आयसीसीला पत्र लिहित पाकिस्तानच्या नावाचा उल्लेख न करता दहशतवादाला खतपाणी घालणार्या देशांवर बहिष्कार टाकण्याची विनंती केली आहे.
आयसीसीची तिमाही बैठक बुधवारी दुबईमध्ये मुख्य कार्यकारिणीच्या (सीईसी) बैठकीसह प्रारंभ होत आहे. यात बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांच्या पत्रावर चर्चा होईल. बीसीसीआयने इंग्लंडमध्ये 30 मेपासून प्रारंभ होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान आपले खेळाडू व अधिकार्यांच्या सुरक्षेव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
आयसीसीच्या कार्याची कल्पना असलेल्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत विस्तृत माहिती देईल. सर्व सहभागी देशांसाठी ही व्यवस्था समान राहिल.
RamPrahar – The Panvel Daily Paper