Breaking News

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदाम, पिस्त्याचे दर वधारले

पनवेल ः वार्ताहर

गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपला असताना पनवेल बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात सुक्या मेव्याची आवक वाढू लागली आहे. सद्यस्थितीत प्रतिदिन 50 ते 60 टन आवक होऊ लागली आहे. काजूसह अक्रोडचे दर स्थिर असले तरी बदाम, पिस्त्याचे दर काही प्रमाणात वाढले आहेत.

पावसाळ्यामुळे दोन महिने बाजारपेठेत सुक्यामेव्याची आवक कमी झाली होती. नागरिकांकडून मागणी कमी झाली होती. गणेशोत्सव जवळ आल्यापासून पुन्हा आवक वाढू लागली आहे. गणपती ते दिवाळी या कालावधीमध्ये मसाला मार्केटमध्ये सुक्यामेव्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. या आठवड्यामध्ये प्रतिदिन 50 ते 60 टन आवक रोज होत आहे. होलसेल मार्केटमध्ये अंजीर 1 हजार ते 1800 रुपये किलो दराने विकले जात आहे. काजू 700 ते 1100 रुपये, खजूर 70 ते 135, अक्रोड 600 ते 800 रुपये किलो दराने विकले जात असून तीनही वस्तूंचे दर स्थिर आहेत.

बदामाचे दर ऑगस्टच्या सुरुवातीपासून वाढण्यास सुरुवात झाली आहे. जुलैमध्ये 580 ते 900 रुपये किलो दराने बदाम विक्री होत होती. सद्यस्थितीमध्ये हे बाजारभाव 630 ते 950 रुपयांवर गेले आहेत. खारीकचे दर 130 ते 300 रुपयांवरून 180 ते 360 रुपये किलो एवढे झाले आहेत. पिस्त्याचे दर 1500 ते 1900 वरून 1600 ते 2200 रुपये झाले आहेत. पनवेल परिसरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती येथून माल विक्रीसाठी येत असतो. हा माल प्रामुख्याने अफगाणिस्तान, इराण, इराक, अमेरिका, काश्मीर व इतर ठिकाणावरून सुकामेवा विक्रीसाठी येत असून गणेशोत्सवापर्यंत मागणी अजून वाढण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply