पनवेल : तालुक्यातील आकुर्ली येथील एका 17 वर्षीय तरुणाची हत्या करणार्या आरोपींना अलिबाग न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आकुर्ली येथील आदित्य म्हसकर हा 23 जून 2013 रोजी घरातून आईसाठी औषध आणण्यासाठी बाहेर पडला होता, मात्र तो घरी परत आला नव्हता. त्यामुळे तो हरवल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. 26 जून रोजी आदित्यचा मृतदेह चिपळेजवळील डोंगरात सापडला होता. तिघा आरोपींनी ही हत्या केली होती. खांदेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली होती. तपासाअंती अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात आकुर्ली गावातील रूपेश उर्फ भुर्या काकडे (31), शोएब आली (26) आणि निलेश म्हसकर(31) यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या वेळी साक्षीदार व दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरविले व तिघांना आजन्म कारावास व प्रत्येकी 1 लाख रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन वर्षांची साधी कैद सुनावली आहे.
Check Also
पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper