कोल्हापूर ः प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या भल्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या महायुतीच्या विजयाचा संकल्प करा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरातील भाजप व शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शहा यांची रविवारी (दि. 13) येथील तपोवन मैदानावर महाजनादेश संकल्प सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते.
या सभेत शहा यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. कृषी, दूध, उद्योग, एफडीआय, शिक्षण या क्षेत्रांत क्रमांक एकवर असलेला महाराष्ट्र 15 वर्षांत काँग्रेस आघाडी सरकारच्या कालावधीत 15 क्रमांकाच्याही खाली गेला होता, पण पाच वर्षांतच फडणवीस सरकारच्या कालखंडात महाराष्ट्र एफडीआयमध्ये क्रमांक एकवर आला. शिक्षणात तिसर्या क्रमांकावर, तर कृषी व उद्योग क्षेत्रात पाचव्या क्रमांकावर आला आहे. आणखी पाच वर्षे द्या, महाराष्ट्र या सर्वच क्षेत्रांमध्ये एक नंबरचे राज्य बनवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.या वेळी शहा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 व 35 अ काढून टाकत काश्मीर भारताशी जोडले. 56 इंचाची छाती असलेल्या मोदी यांनीच ते कलम रद्द करून टाकले. ते लोकांना आवडले आहे, पण शरद पवार विचारतात की हे कलम का हटवले? त्यांना काय अडचण आहे हेच समजत नाही.
RamPrahar – The Panvel Daily Paper